18 January, 2020



महोत्सव

आजपर्यंत उत्तर भारतात अनेक वेळा येणं झालं. इथल्या निसर्गाचे नवनवीन चमत्कार "याची देही याची डोळा" पाहिले. उबदार उन्हापासून हाडं गोठवणार्‍या थंडी पर्यंत; अगदी मुसळधार पाऊस सुद्धा! विशेषतः हिमालय हे उत्तर भारतातलं खास आकर्षण. इथला निसर्ग त्याची व्यवस्था ही इतकी सुंदर आहे की त्याच्या अचूक आणि काटेकोर पणाने मना थक्क होतं. दूरवर नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगार वनराई आणि सरळ सोट पहाड; हो पहाडचं! आपल्याला तर नेहमीच निसर्गाच्या व्यवस्थेचं कुतूहल वाटतं. प्रत्येक गोष्टीत इतकी अचूकता कशी असू शकते याचं नवलच वाटतं. खरंतर आज सतरावी किंवा अठरावी ट्रिप असेल माझी, आणि आज हळूहळू लक्षात येतंय की नेमकी ही व्यवस्था चालते कशी. प्रतीकात्मक बोलायचं झालं तर ही व्यवस्था एखाद्या मैफिली सारखी आहे. या मैफिलीचा नायक हा इतका अचाट आणि भव्य आहे की ती ऐकण्यासाठी नव्हे ती अनुभवण्यासाठी सुरुवातीला खूप कष्ट पडतात. ही मैफिल म्हणजे आंदण नव्हे तुमच्या पदरात येऊन पडेल, खूप काही करावं लागतं या मैफिलीचा भाग होण्यासाठी! पण एकदा का तुम्ही आचाभाग झालात मग मात्र फक्त आनंद आणि समाधान!

मुळात आनंद आणि समाधान या शब्दांचा खरा अर्थ काय यासाठी या मैफिलीचा भाग व्हावंच लागतं. आता हा नायक हा इतका तरबेज आहे की सुरुवातीला तो आपल्या रसिकांची परीक्षा घेतो, या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर तुम्हाला मैफिलीच्या प्रवेशद्वारात उभं राहता येत. परंतु थेट सभागृहात प्रवेश मिळवण्यासाठी, मैफिलीच्या नायकाला शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अलौकिक असा घंटानाद करून स्वतःच्या मनाला शांत करून आणि सर्व विशाद बाजूला ठेवून शरणागत भावनेन तुम्ही आलात तर मात्र हा नायक तुम्हाला अगदी आपलंसं करतो. मग हळू हळू हे मैफिल उलगडत जाते, सूर्योदय व्हावा तशी किंवा कळी उमलते तशी! निसर्गाच्या मैफिलीची स्वतः ची एक लय असते, आत्ममग्न आणि अलख! एखादी पारंपरिक बंदिश पुनः पुन्हा वेगवेगळ्या ढंगात आणि रंगात रंगत जाते. नव्याचा बाज आणि जुन्याचा साज अशा दुहेरी पटलावर ही मैफिल चालू असते.  साथीदार म्हणून साक्षात शिवशंभू आपला खास पखवाज घेवून येतात.

असा हा हिमालयातला निसर्ग नेहमीच वेगवेगळी आव्हाने उभी करतो आणि आईच्या प्रेमळ मायेनी कुशीतही घेतो. यासगळ्यात मागे राहते संवेदनांची लय आणि अनुभूतीची दूर दूर पसरणारी झांज!

- अमेय सु. बाळ

25 March, 2015

Fare ‘Well’


खरं तर कालपासून अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता कृतज्ञता व्यक्त न करण्याबद्दलची आहे. काल Farewell झालं. प्राध्यापक झाल्यापासून पहिलंच! ज्या बॅचला तीन वर्षं सलग  शिकवलंतीच ही बॅच! आकाशाला गवसणी घालण्याल्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेली ही मुलंआता त्यांच्या पंखांत गगनभरारीचं बळही आलंय हे काल जाणवलं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तीन वर्षं मलाखडूससडूभडकूप्रोजेक्ट फाडू म्हणणारे सगळेजण माझ्याबद्दल मनापासून चांगलं बोलत होते. मन भरून येत होतंआपण जे करतोय ते योग्य दिशेने करतोय याची पोहोच पावती मिळत होती त्यांच्या बोलणातून! खरं तर हे यश माझं नाही ते माझ्या आई वडिल आणि गुरूजनांचं आहे. त्यांनी मला जो मार्ग दाखवला त्या मार्गावर मी चाललो आणि माझं आयुष्य़ आकारात आलं आणि तोच वसा मी पुढे नेतोय. आधी माझे वडिलमग आई आणि नंतर नेने मॅडम नी जसं मला घडवलं तसा मी घडत गेलो. पुढे शिंदे सर आणि रानडे सर यांनी घडवलं. मग बोरकर गुरूजी भेटले आणि परिसस्पर्शच झाला जणू! बोरकर गुरूजी नेहमी म्हणतात "आपल्या कार्यक्षेत्राच्या बाबतीत आपण कधीही  समाधानी असू नये. कारण समाधानानी आपला विकास खुंटतो." काल क्षणभर समाधान वाटलं की आपल्या गुरूंची शिकवण योग्य ठरलीपण लगेचच मनात विचार आला की आता माझी जबाबदारी वाढल्ये. जी मुलं माझ्याकडे आदर्श म्हणून बघतात उद्या पुढे येणार्‍या अनेक पिढ्य़ा मला घडवायच्येत. त्यामुळे इथेच थांबून चालणार नाही आत अजून मेहनत घ्यावी लागणार. काल सगळे म्हणत होते "You are the best teacher we ever had, who not only taught us lessons from syllabus; but also  lessons of how live life" मला माहित नाही मे चांगल शिक्षक आहे क्की नाही पण एवढं नक्की जाणवलं की मी एक खूप चांगला विद्यार्थी होऊ शकतो. ती क्षमता’ माझ्यात आहे. काल माझ्याबद्दल जे काही चांगलं बोललं गेलं ते मी माझ्या गुरूजींना आणि आई वडिलांना समर्पित करतो कारण आज मी जो काही आहे तो त्यांच्या मुळे आहे. म्हणूनच सुरूवातीला म्हटलं की अस्वस्थता कृतज्ञता व्यक्त न करण्याची आहे. आता जरा बरं वाट्टंय.



18 February, 2015


मारूबिहाग

१७०; नाही १८७ हो, बरोबर १८७! तरी पण अजून लक्षात येत नाही काय जादू आहे. म्हणजे साधारण अतिशय मठ्ठातल्या मठ्ठ मुलाला सुद्धा १०० वेळा एखादी गोष्ट सांगितली तरी ती समजते; पण माझी अवस्था त्याच्यापेक्षा हालाकीची झाली आहे. १८७ वेळा तीच गोष्ट पुन:पुन्हा समजून घ्यायचा प्रयत्न केला, तरीही नाहीच समजलं. म्हणजे मठ्ठ या वर्गवारीच्या पुढेही काहीतरी असतं हे तरी कळलं. म्हणूनच पुढे विचार करणं सोडून दिलं. नुसता जे येतंय, ते काही घडतंय ते अनुभवत गेलो. हलकं वाटलं खूप, मोकळं सोडून दिलं स्वत:ला. जसा प्रवाह वाहत होता तसा वाहत गेलो. मग हळूहळू लक्षात आलं की ज्या गोष्टीच्यामागे आपण हात धूवून लागलो होतो. ती आता आपोआपच आपली वाटत्ये, हळूहळू आपल्या जवळ येवू पाहत्ये, अं हं आपल्याला जवळ घेत्ये आणि एक क्षण असा आला मी माझा राहिलोच नाही. ज्याचा ध्यास घेतला त्यानी मला, माझ्या मनला, माझ्या आयुष्याला व्यापून घेतलं होतं. ती गोष्ट म्हणजे मारूबिहाग! होय, एकच रेकॉर्ड १८७ वेळा ऐकली, नाही कळला; कसा कळणार म्हणा? कारण काही गोष्टींना भौतिक परिमाणांवर नाही मोजता येत ही अक्कलच नव्हती. जसा त्या भौतिक परिघाबाहेर आलो, निव्वळ एक अनुभव म्हणून मारूबिहाग ऐकला तेव्हा आपोआपच मी त्याचा झालो किंवा त्यांनी मला त्याचं करून घेतलं.

आजही मारूबिहागाचे स्वर कुठूनही कानवर पडले की क्षणभर रेंगाळतो. पावलं थांबतात, मन भारावून जातं. सगळ्या जगाचा विसर पडतो. खरंच नेणिवेतून अनुभवास येणारी ही जाणीव अतिशय विलक्षण आणि निर्गुणाकडे नेणारी आहे.


कधी कधी विचार येतो एक मारूबिहाग समजून घ्यायला १८७ वेळा ऐकावा लागला तरीही समजला नाही. मग माझ्याकडे असलेल्या इतर १९९ चं काय करावं? 

23 June, 2014





निर्गुण . . . !

नको सत्तेचा व्यापार, नको धन व्यवहार
नको सगुण साकार, जिथे ब्रह्म निराकार॥

साधकाचे प्रतिमान, कैवल्याचे अनुमान,
जोगियाचे हेचि धाम, एक निरंजन नाम॥

व्यर्थ विषयांचे मनन, व्यर्थ वेदांचे पठण,
व्यर्थ परमार्थ जतन, ज्यास नाही ब्रह्म ज्ञान॥

कुणी अभंग रचिती, कुणी सुफियाना गाती,
कुणी सतनाम घेती हीच ब्रह्म्याची प्रचिती॥

मंदिराच्या गाभारर्‍यात, मशिदीच्या घुमटात
एक अनाहत नाद, अलख निरंजन गात॥

बाळ सांगे सावकाश, ऐका कान हो देवून,
मृत्यू पुढचे जीवन, तेचि निर्गुण निर्गुण॥

- अमेय सु. बाळ.

14 April, 2014








अंतरिक्षाचे प्रवासी

तानपुर्‍याचा नाद कानात आणि मनात झंकारतोय. मैफिलाचा समा बांधला गेलाय. साथीदारही तयार आहेत. रसिकांची उत्कंठा आता शिगेला पोहचले आणि अशावेळी सांध्यपर्वातील अस्ताला जाणार्‍या, तरीही तेजस्वी सूर्याच्या हुंकारातून निघालेला कोमल ऋषभ लावून मैफिलीचा नायक रसिकांच्या रसिकतेलाच आव्हान देतो. आपल्या प्रतिभेनी तो समोरच्याला अचंबितच करत नाही; तर थेट त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेतो आणि मग ती मैफिल शब्द, सूर हे सर्व विसरून जाते; राहते ती फक्त अनुभूतीची लय आणि संवेदनांची दूर दूर पसरत जाणारी झांज. . .
ही मैफिल कोणा गायकाची नाही. . .  ती आहे आत्ममग्नतेतून चिरंतनाकडे नेणार्‍या एका संध्यासूक्तातील यात्रिकाची. . .
कवी ग्रेस यांची

नुकतंच कवी ग्रेस यांचं मितवा वाचून संपलं. आपल्यापैकी प्रत्येक वाचक जसा एका वाक्यापाशी शहारून थबकतो; तसाच मी ही थबकलो. “I must see my cradle & grave both hanging! हे ग्रेसचं सतत भूल पाडून विचार करायला लावणारं महावाक्यच! या एका वाक्यात ग्रेसच्या कवितांचा आशय, त्यांची व्याप्ती आणि त्यांचं मर्म दडलेलं दिसून आलं. एवढंच नव्हे तर हा कलंदर कवी मराठी कवितेला आशय, अलंकार, भावना इथपर्यंत मर्यादित न ठेवता तिला मानवी उत्पतीच्या आदिम काळापर्यंत नेतो; तिथेच न थांबता मानवी मनात साठलेल्या आदिम दु:खाच्या कळा शब्दबद्ध करून प्रत्येक कविता जणू या वेदनेचा हुंकार असल्यासारखीच वाटते.
म्हणूनच कवी ग्रेस यांचं लेखन आणि पं. कुमार गंधर्वांचं गाणं यांची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. म्हणजे एकीकडे ग्रेस 

“माझं वय हे भूतकाळात, वर्तमानात, भविष्यात कुठेही बसत नाही. मी प्राचीन माणूस आहे, मी कायमच राहणार.” आणि नेमकी हीच प्रचिती कुमारांच्या निर्गुणी भजनात येते. “उड जाएगा हंस अकेला” असं सांगत कुमार देहभान विसरायला लावतात.

मराठी संत साहित्य, सूफी तत्वज्ञान, पाश्चात्य कवीपैकी काही महत्त्वाचे आणि हिंदी-उर्दूतले काव्य या सर्वांचे मंथन करून ग्रेस यांनी आपली विशिष्ट शैली केली. तर कुमारांनी सगळ्या घराण्यांच्या चीजा अर्जित करून, संतरचना आत्मसात करून, त्याला माळव्यातील लोकसंगीताची जोड देवून, त्यांना निसर्गदत्त निर्गुणी शैलीचा साज चढवून चिरंतनाकडचा प्रवास केला आणि सर्व रसिकांनाही त्याची अनूभूती दिली. अजून एक साम्य म्हणजे या दोघांनी कधीही आपली कलाकृती रसिकांनी समजून घ्यावी, त्याचा अर्थ लावावा असा अट्टहास कधीच केला नाही. त्यांची कलकृती म्हणजे जिवंतपणी मोक्षाची अनूभूती होती आणि आहे.

ग्रेस यांची कविता मानवी जन्माच्या आधीपासून त्याच्या मृत्युपर्यंत आणि त्यानंतरचाही वेध घेणारी; नेमकं सांगायचं तर सूक्ष्माकडून स्थूलाकडे आणि स्थूलाकडून पुन्हा सूक्ष्माकडे जाणारी होती आणि आहे; तसंच कुमारांचं गाणं देखील एखाद्या नाथपंथीयासारखं हातात चिमटा घेवून ‘अलख निरंजन’ म्हणत सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारं होतं आणि आहे. ‘आहे’ म्हटलं कारण ग्रेसची कविता आणि कुमारांचं गाणं हे शरीर सोडून चराचरात विहार करणार्‍या अविनाशी आत्म्याप्रमाणे आहे.

शेवटी एवढंच म्हणीन की, निराकार, अमूर्त असलेल्या; ज्यात सर्व विश्व सामावलेले आहे, अशा अंतरिक्षाचे हे दोन प्रवासी! जे मानवी उत्पत्तीच्या आधीही होते आणि त्याच्या विनाशानंतरही असतील. 
- अमेय सु. बाळ

26 July, 2013















तरीही . . .

चालले पुढल्या वाटा
तरीही . . .
मन मागेच रेंगाळते,
सोडून आले सगळे
तरीही. . .
चाहूल रेंगाळते.

तुला पाहूनी हसले होते,
तुझ्याबरोबर रमले होते,
एकटेच सोडले तुला
तरीही . . .
पाऊल रेंगाळते.

हात तुझे हाती होते,
गीत तुझे ओठी होते,
गाईलेच नाही
तरीही. . .
ती धून रेंगाळते.

चांदरात बहरली होती,
प्रीत खुळी मोहरली होती,
तुझीच झाले नाही
तरीही . . .
तृप्त गात्र गंधाळते.

संपविले मीच सगळे,
झालो आपण वेगळे,
विरले श्वास
तरीही . . .
नातेच सांभाळते.
-      अमेय सु. बाळ

03 June, 2013


. . . थोडी कम थी।


एक श्याम और बस तुम थी,
गम नही बस ऑंखें थोडी नम थी।

इश्क के ज़ाम पे ज़ाम पिए जा रथे हम,
कडवाहट नही बस मिठास थोडी कम थी।

अपनीही यादों को लिये जल रहे थे हम,
धूप नही बस छाव थोडी कम थी।

ढलते सूरज की तरह हम भी कही ढल रहे थे,
अंधेरा नही बस रोशनी थोडी कम थी।


अपनीही धुंद में निकल पडे थे की राह पर,
मौत नही जिंदगी थोडी कम थी।
-      अमेय सु. बाळ